Beed : देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ पुन्हा एकवटले; दोन दिवस अन्नत्याग आंदोलन, दखल घेतली नाही तर दिला ‘हा’ इशारा

बीडः मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता ६७ दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या हत्या प्रकरणातील ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आंधळे हा फरार असून अद्यापर्यंत त्याचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही, लोकशाही केवळ नावापुरतीच राहिले आहे का असा सवाल मस्सजोगच्या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे मस्साजोग गावाचे ग्रामस्थ पुन्हा एकवटले असून फरार आरोपी कृष्णा आंधळे आणि इतर मागण्या घेऊन ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या बैठकीत आवादा कंपनीने गावाच्या निर्णयात सहभाग नोंदवायला पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तसेच आवादा कंपनीचे गोडावून इथे आल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी केस दाखल केली पण केस दाखल करून काय उपयोग नाही, प्रत्यक्ष गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी या बैठकीत ग्रामस्थांनी घेतली आहे.
राज्य शासनावर नाराज म्हणून आंदोलनाचा इशारा
कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी करो या मरोचा इशारा देत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात लहान मुले, वयोवृद्ध आणि सर्व गटातील लोकांसह महिलांचाही सहभाग असणार आहे. दोन दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. हे प्रकरण गंभीरपणे घ्या, नाहीतर खूप मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मस्साजोग ग्रामस्थांनी दिला आहे.
‘या’ आहेत गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
PI महाजन आणि API राजेश पाटील यांना बडतर्फ करा. सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा. वाशीच्या PI ने आरोपींना मदत केली, त्यांना आतापर्यंत का आरोपी केले नाही? 25 तारखेपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी त्यांना मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही आंदोलन करू असे गावकरी म्हणाले. यामुळे आगामी काळात हे आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
..आता एक इंचही मागे येणार नाही
नुकतीच काही दिवसांपूर्वी देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका मांडणारे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर देखील अजित पवार यांना भेटले. यावरून अनेक चर्चा करण्यात येत आहेत. हे आंदोलन आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात करत आहोत. आम्ही गावकरी ठाम आहोत. कुणी कुठेही जावो, कुणालाही भेटो जोपर्यंत आमच्या सरपंचाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक इंचही मागे येणार नाही, अशी भूमिका या बैठकीत गावकऱ्यांनी एकमताने घेतली आहे.





