नवी दिल्ली : अलिकडे करोनाबाधितांच्या संख्येत झालेली वाढ ही करोनाच्या सामूहिक संसर्गाचा परिणाम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा म्हणाले दिवसांत 30 हजार बाधितांची वाढ हे सामूहिक संसर्गाचेच लक्षण आहे. ही वाढ स्फोटक आहे. दररोज 30 हजारपेक्षा अधिक बाधित वाढत आहेत. ही देशासाठी अत्यंत वाईट स्थिती आहे, हे वाईट चिन्ह देशांत सामूहिक संसर्ग झाल्याचे निदर्शक आहे, असेही डॉ. मोंगा म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशांत 38 हजार 902 बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रविवारी सकाळी बाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 618 वर पोहोचली. तर या काळात देशांत 543 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
देशाच्या ग्रामीण भागात करोना पसरत आहेत ही सर्वात चिंतेची बाब आहे. कारण तेथे वैद्यकीय सुविधांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आपण दिल्लीत साथ नियंत्रणात आणू, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्यप्रदेशातील दूर्गम भागातील स्थिती काय असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
थिरूवनंतपुरमच्या काही किनारावर्ती भागात करोनाचा सामूहिक संसर्ग झाला आहे, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी नुकतेच केले होते. त्यापाठोपाठ आयएमएने व्यक्त केलेल्या निष्कर्षाला महत्त्व आले आहे.