प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्राची संस्कृती आणि शूरवीरांच्या पराक्रमाची महती सांगणारे जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आणि मानवता, समता, तसेच सेवाभाव आणि प्रेमाचा संदेश देणारी साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना सातारा येथे होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ९९ विद्यार्थी सामूहिकरीत्या सादर करून इतिहास घडवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित मराठी साहित्य संमेलन दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे होत आहे. संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी संमेलन गीताबरोबरच जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सादर होणार आहे. या उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील २५ शाळांमधून आठवी ते बारावीतील ९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. खरा तो एकची धर्म, या प्रार्थनेची संगीततज्ज्ञ राजेंद्र आफळे यांनी नव्या चालीत बांधणी केली असून, त्यांना संगीततज्ज्ञ बाळासाहेब चव्हाण, संगीत संशोधक आणि अभ्यासक डॉ. स्वरदा राजोपाध्ये, ज्येष्ठ संगीत शिक्षिका वर्षा जोशी, ज्येष्ठ शाहीर भानुदास गायकवाड यांच्यासह संमेलनगीताचे गीतकार राजीव मुळ्ये, सचिन राजोपाध्ये, मिलिंद देवरे, सचिन शेवडे यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमात छत्रपती शाहू ऍकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, शारदाबाई पवार आश्रमशाळा, यशोदा शिक्षण संस्था, पोदार इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांचा समावेश आहे.