Marathi Medium Schools – मावळ तालुक्यातील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने निनादणाऱ्या या शाळा आज ओस पडताना दिसत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे मातृभाषेतील शिक्षणाचा पाया डळमळीत झाला आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये ‘इंग्रजी म्हणजेच उज्ज्वल भविष्य’ हा समज खोलवर रुजला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देत आहेत. शेती, मजुरी करणारे पालकही कर्ज काढून फी भरताना दिसतात. मराठी शाळेत मुलांना घालणे कमीपणाचे वाटू लागल्याचे वास्तव समोर येत आहे. याचा थेट परिणाम गावोगावच्या शाळांवर झाला आहे. कामशेत, लोणावळा, तळेगाव, वडगाव आणि दुर्गम भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ज्या वर्गांमध्ये पूर्वी ४० ते ५० विद्यार्थी असायचे, तिथे आता वीस-पंचवीस विद्यार्थीही मिळणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तुकड्या बंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. जिल्हा परिषद शाळांची स्थिती बिकट. उन्हाळी सुट्टीत घरोघरी जाऊन पालकांना समजावून सांगावे लागते. प्रवेश मोहिमा राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक मराठी शाळांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत. डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग, क्रीडा सुविधा आणि अनुभवी शिक्षक उपलब्ध आहेत. काही ठिकाणी सेमी-इंग्रजी माध्यमही सुरू करण्यात आले आहे. तरीही पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडेच आहे. ग्रामीण भागात इंग्रजी शाळांच्या बसेस थेट घरापर्यंत पोहोचतात. मुलं टाय-बेल्ट घालून बसमध्ये बसतात, हे दृश्य पालकांना आकर्षित करते. मात्र, या चमकधमकपलीकडे शिक्षणाचा दर्जा आणि मुलांचे मूलभूत आकलन याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांची बौद्धिक क्षमता अधिक चांगली विकसित होते. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते. मात्र, इंग्रजीच्या आंधळ्या स्पर्धेत ही बाब दुर्लक्षित होत आहे. ही केवळ शाळांची समस्या नाही. ही मावळच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडित बाब आहे. मराठी भाषा, संस्कार आणि स्थानिक परंपरा यांचे जतन मराठी शाळांमधूनच होते. जर ही शाळा बंद पडल्या, तर पुढील पिढी आपल्या मुळांपासून दूर जाईल. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपाय शोधणे गरजेचे आहे. मराठी शाळांबाबतचा न्यूनगंड दूर करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. आज निर्णय घेतला नाही, तर उद्या उशीर होईल. मावळच्या मातीत मराठी शाळांचा दिवा कायम तेवत ठेवायचा असेल, तर सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.