Maratha Reservation: अल्टिमेटम संपला, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे पुन्हा आमरण उपोषण

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना देण्यात आलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती. त्यानुसार आजपासून ते पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहेत.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही. एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
गिरीश महाजन यांनी उपोषणाला न बसण्याचे आवाहन केले होते. यामुळे शरीराला ताण होईल,असे महाजन जरांगे यांना सांगत होते. यावर जरांगे यांनी आरक्षण द्या, मी उपोषणाला बसत नाही, असंही त्यांनी सांगितले. कायद्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागेल त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता आम्ही चाळीस दिवस दिले मग आता वेळ कशासाठी पाहिजे समाज म्हणून आम्ही त्यांना एक तासही वेळ देऊ शकत नाही, तुम्ही आज रात्रीच आरक्षण जाहीर करा असेही त्यांनी म्हंटले आहे.
मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका – मनोज जरांगे पाटील
तर बारामती येथे झालेल्या सभेत जरांगे यांनी म्हंटले होते की, मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये. मराठा समाजाचा लढा शांततेत सुरू आहे. मराठा समाजाने कधीही जात पाहिली नाही. 24 तारखेला सरकारचे 40 दिवस संपत आहेत तोपर्यंत शांत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला होता.
हैदराबादला 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठ्यांवर फार अन्याय झाला आहे. आरक्षणाचे मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. आमच्या पूर्वजांनी अनेकांना मोठे केले. गाफील राहू नका, ताकतीने तयारी सुरू करा, आरक्षणाचे महत्व घराघरात पोहोचवा, असा संदेशही जरांगे यांनी दिला होता.




