मुंबई : गेल्या 47 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा मराठा समाजातील तरुणांनी केली.
मराठा उमेदवारांना नियुक्त्या मिळाव्यात म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समजतील तरुणांचे आंदोलन आझाद मैदानात सुरु होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मराठा तरुणाची आजाद मैदानात भेट घेतली. त्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
मराठा समाजातील तरुणांच्या मागण्यांबाबत नागरविकास मंत्र्यांसह विजय वडेट्टीवार, आमदार भरत गोगावले आणि विनायक मेटे यांनी आंदोलक तरुणांची भेट घेऊन, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मराठा आंदोलक तरुणांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी या पत्रकात दिली.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असं विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेत विनायक मेटे यांनी 2014 च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होत नाही, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देता येणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले.
आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाजू मांडण्यासाठी कायदेतज्ज्ञ, सर्वपक्षीय नेते, हे आंदोलक तरुणाशी चर्चा करतील. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.