पुणे – जागतिक शांतता आणि आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फार्मसी क्षेत्रात आता करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण या संधींची निवड करताना आपल्या मनातील भीतीला दूर ठेवा. तुमच्यामुळे एखाद्याचे आयुष्य चांगले होत असेल तर तेच तुमचे खरे यश असेल, असे मार्गदर्शन बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कृष्णा अय्यर यांनी केले.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूडमधील स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. “ऍडव्हान्सेस इन फार्मास्युटिकल रिसर्च ऍन्ड टेक्नालॉजी’ हा कार्यशाळेचा विषय होता. यावेळी एमआयटीचे प्र-कुलगुरू प्रा. मिलिंद पांडे, भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. एस. एल. बोधनकर, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे डॉ. प्रशांत मुरूमकर, प्रशांत पवार, सुमंत भट, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा. भानुदास कुचेकर, स्कूल ऑफ फार्मसीचे प्रमुख डॉ. अक्षय बाहेती आणि प्रा.अनिल पवार आदी उपस्थित होते.
माईंड टू मार्केट ही संकल्पना महत्त्वाची असून तरुणांच्या नवकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात या दृष्टीने अशा प्रकारच्या कार्यशाळा नक्कीच महत्त्वाच्या ठरतील. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली संशोधन व अभिनवतेतील क्षमता विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा मेळ पारंपरिक शिक्षण पद्धतीशी घातल्यास फार्मसी क्षेत्रातील भविष्य क्रांतिकारकरित्या बदलू शकेल, असे मिलिंद पाडे म्हणाले.