Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी नुकतेच पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनामध्ये काहीसा बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा आणि संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी आंदोलकांना केला आहे. त्यानुसार, रास्तारोको आंदोलन केवळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केलं जाणार असून दुपारी 1 नंतर या आंदोलनाचं रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने आंदोलनाच्या स्वरुपात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? मनोज जरांगे म्हणाले की, “नाशिकला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व समाजाला मानणारे आहोत. मागच्या वेळेप्रमाणे कोणी जाळपोळ करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल करण्यात आले आहे. 11 ते 1 या वेळेत रास्तारोको करा आणि 1 वाजल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर किंवा मंदिरासमोर या रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा. तर शहरात तहसीलसमोर किंवा कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करा. उद्यापासून रास्तारोको होणार नाहीत. परंतु 3 मार्चला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.” तसेच उद्या 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला आहे. मनोज जरांगेंनी यावेळी राज्य सरकारवरही सडकून टीका केली आहे. “मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून रडीचा डाव खेळला जात आहे. सरकार अस्तित्वात असूनही त्यांची परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद राहिलेली नाही. राज्य सरकारला आंदोलनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या राजाला दया नाही. तीन-तीन राजे असूनही त्यांना दया आणि माया नाही. मला हे हरवायचे बघत आहेत. मुख्यमंत्री यांना आवाहन आहे, त्यांच्यामुळे जनतेच्या नजरेतून तुम्ही पडाल. तीन राजे एकत्र या आणि निर्णय घ्या. आम्हाला वेठीस धरू नका,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.