Manoj Jarange : माझ्या विरोधात कट रचला जात आहे. कारण काय तर मी गरिबांसाठी लढा देत आहे. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. हिंगोलीच्या कामठा फाटा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला आहे. मात्र आपणही काही कमी नाही असे म्हणत त्यांनी नाव न घेता इशाराही दिला आहे. मात्र मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये फार मोठा कट हा मुंबई येथे रचला जातोय, त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. तेथे तर स्टिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र आपणही काही कमी नाही, आपली देखील यंत्रणा कामाला लागली आहे. कट का रचला जात आहे? तर मी फक्त गरिबांच्या लेकरांसाठी काम करतो म्हणून. मात्र आपल्याला काही फरक पडत नसल्याचे सांगत मनोज जरांगे यांनीही इशारा दिला आहे. परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसले आहेत. याच शेतक-यांची मनोज जरांगे यांनी नुकतीच भेट घेतली आणि शेतक-यांशी चर्चा केली. आपले म्हणणे सरकार दरबारी मांडले पाहिजे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आणि शेतक-यांचे महसूलमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे.