प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवर उमेदवार ठरवताना मोठा पेच निर्माण झाला आहे.“आघाडी किंवा युती झाली तर आम्हीच लढू” असा ठाम पवित्रा काही इच्छुक उमेदवारांनी घेतल्याने प्रमुख नेत्यांपुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे.पक्षाने अधिकृत उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याची तयारी अनेकांनी दाखवली असून त्यामुळे अंतर्गत कलह उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल करण्याचे संकेत दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची मानसिकता बहुतांश इच्छुकांमध्ये नसल्याचे स्पष्ट होत असले तरी आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील समन्वयक नेते उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करत असून अंतर्गत नाराजी दूर करण्याची धडपड सुरू आहे. मंचर नगरपंचायतीची निवडणूक रंगात आली असून तसतशी राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची बनत चालली आहेत.