प्रभात वृत्तसेवा मंचर – नगरपंचायत निवडणुकांचा चेहरा बदलत चालल्याची खंत अनेक प्रामाणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वी प्रामाणिकपणा, कामाचा दर्जा आणि जनसंपर्क यावर उमेदवारांचे भवितव्य ठरत होते; परंतु सद्यस्थितीत प्रामाणिक आणि गरीब उमेदवार प्रचाराच्या महापुरातून अक्षरशा बाजूला फेकला गेल्याचे दिसून येत आहे. मात्र, सध्याच्या निवडणुकांत पैशाचा महापूर, बडेजाव, दडपशाही आणि मोठी प्रचारयंत्रणा या गोष्टी निर्णायक ठरताना दिसत आहेत. उमेदवारी देताना पक्ष नेतृत्व आणि स्थानिक नेते पैसेवाल्या उमेदवाराचाच शोध घेतात. प्रभागात त्याने काम केलेले असण्याची अट नसते. मात्र, आर्थिक क्षमता असणे आवश्यक बनते. परिणामी प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणारे, जनतेच्या गरजांसाठी धावपळ करणारे आणि शासनाच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवणारे गरीब व साधे उमेदवार उमेदवारीपासूनही दूर राहतात. यामुळे निवडणूक ही विचार, काम आणि प्रामाणिकपणापेक्षा पैशाच्या जोरावर रंगत असल्याचे चित्र दिसते.मतदारांच्याही मानसिकतेत बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी मतदार पैसेवाल्या उमेदवारालाच प्राधान्य देताना दिसतात. निवडणूक काळात आर्थिक मदत किंवा तत्सम लाभ मिळण्याच्या अपेक्षेपोटी काही मतदार आपले मत आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराकडे वळवत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. पाच वर्षे सातत्याने प्रभागात प्रामाणिक काम केलेल्या अनेक अपक्ष आणि गरीब उमेदवारांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.“शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, लोकांचे काम केले, पण आता मतदार आमच्याकडे पाहायलाही तयार नाहीत,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. यामुळे नगरपंचायत निवडणुका पैशाच्या प्रभावाखाली गेल्याची जाणीव अधिक ठळक होत आहे.