प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदार यादींच्या गोंधळामुळे मतदार मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. एकाच कुटुंबातील नवरा एका प्रभागात तर बायको दुसरा प्रभागात तसेच कुटुंबियातील चार–पाच जणांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याचे प्रकार समोर येत असून काही जणांची नावे तर मतदार यादीतूनच वगळली गेल्याचे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे मतदारांना आपण नेमके कोणत्या प्रभागात असल्याची माहितीच नसल्याने मतदानाच्या दिवशी मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी येथे ग्रामपंचायत प्रशासन होते. त्यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आली आणि नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. मात्र, या प्रभाग रचनेविषयी नागरिकांना पुरेशी माहिती न दिल्याने गोंधळ वाढत चालला आहे. अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, नाव कोणत्या यादीत आहे. याची कल्पना नसल्याने ते चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे, मतदार यादी हातात घेऊन फिरणाऱ्या उमेदवारांनासुद्धा मतदार प्रत्यक्ष घरी जाऊन शोधावे लागत आहेत. एका घरातील सदस्य वेगवेगळ्या प्रभागात विभागले गेल्याने उमेदवारांची प्रचारयंत्रणा देखील गोंधळलेल्या स्थितीत आहे. नगरपंचायतीत होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रशासनाने मतदारांना प्रभाग रचनेची स्पष्ट माहिती दिली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत मतदानाच्या दिवशी गर्दी, चुका आणि तक्रारींचा भडिमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांना योग्य माहिती मिळावी, भ्रम दूर व्हावा यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. “आमच्या घरातील चार जण चार वेगवेगळ्या प्रभागात गेले. कुणाचं नाव कुठे आहे तेच कळेना. मतदानाच्या दिवशी कुठे जावं, कसं शोधावं याचीच काळजी लागली आहे.” -दत्तात्रय बेल्हेकर,मंचर. “मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच जनजागृती करण्यात आली. त्यावेळी काही हरकती घेतल्या, त्याप्रमाणे त्या दुरुस्त करून त्यांना न्याय देण्यात आला. सद्यस्थितीत निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यामुळे आणि मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे काही करता येऊ शकत नाही. मतदारांना काही अडचण वाटल्यास थेट संपर्क करावा. त्यांना मार्गदर्शन केले जाईल.” -गोविंद जाधव,मुख्याधिकारी, मंचर नगरपंचायत.