मंचर (पुणे) – करोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंचर ग्रामपंचायत कार्यालयात मंचर शहर बंदबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शनिवार (दि. 12) ते गुरुवार (दि. 17) या सहा दिवसांच्या कालावधीत मंचर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, व्यापारी बांधव उपस्थित होते.
मंचर शहर हे आंबेगाव तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांची व व्यवसायांची ही मुख्य बाजारपेठ आहे. या आधीही शनिवार (दि. 5) ते शुक्रवार (दि. 11) या कालावधीत सात दिवस शहर बंद ठेवण्यात आले होते. या बैठकीला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, माजी सरपंच दत्ता गांजाळे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात,पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, अल्लू इनामदार, वसंतराव बाणखेले, युवराज बाणखेले, उद्योजक अजय घुले, महेश मोरे, रंगनाथ थोरात, सुहास बाणखेले, सखाराम बागल यांसह ग्रामस्थ आणि व्यापारी उपस्थित होते.
तालुक्याच्या आरोग्य विभागाने मंचर शहरात धारावी पॅटर्न राबवत एका दिवसात संपूर्ण शहरातील सहा हजार कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत एका दिवसात 1 हजार 111 संशयित रुग्णांतून 176 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या बैठकीमध्ये शहरातील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदचा कालावधी शनिवार (दि. 12) ते गुरुवार (दि. 17) या सहा दिवसाचा असल्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. या बंदच्या कालावधीत मंचरकरांनी, तसेच बाहेर गावांतील नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.