मंचर – पुणे -नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील मंचर बायपास रस्ता वाहतुकीसाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत किंवा त्याअगोदर खुला होईल, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील खासदार असताना केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून त्यांनी पुणे -नाशिक महामार्गावरील खेड, कळंब, मंचर, नारायणगांव, आळेफाटा या पाच ठिकाणच्या बायपास रस्त्याची कामे मंजूर करुन घेतली होती.
सुरुवातीला खेड घाट व नारायणगाव रस्त्याची कामे पूर्ण होत आली आहे. खेड घाट रस्ता दहा ते बारा दिवसांत चालू होईल, तर नारायणगाव बायपास रस्ता एक ते दीड महिन्यात खुला होणार आहे. असे सांगून आढळराव पाटील म्हणाले, काम चालू असलेला तांबडेमळा ते कळंब रस्त्याची पाहणी केली असता काम समाधानकारक असून रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत किंवा त्याअगोदर खुला होईल.
मी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास येत असल्याचे पाहून मला नक्कीच समाधान वाटत आहे. असे आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिवाजी राजगुरु, उपतालुकाप्रमुख अशोक थोरात आदी उपस्थित होते.