मुंबई – अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा अभाव निर्माण झाला. यामुळे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर पलायन करण्याची वेळ आली. हातावर पोट असणारे हे मजूर अक्षरशः हजारो किमीचा प्रवास करून आपल्या गावी जावू लागले. तामिळनाडूत राहणाऱ्या 23 वर्षीय तरूण मजूराचा पाचशे किमीचा प्रवास केल्यामुळे गुरूवारी मृत्यू झाला आहे.
हा तरूण तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नागपूरमधून तामिळनाडूच्या नामक्कलपर्यंत पोहोचण्यासाठी पायी निघाला होता. लोगेश बालासुब्रमनी जवळपास पाचशे किमीचा प्रवास करून बुधवारी सिकंदराबाद येथे पोहोचला. तिथे एका आश्रमात आराम करताना त्याचा जीव गेला. लोगेश शेल्टर रूममध्ये आराम करताना एका जागी बसला होता तिथे त्याने अचानक आपला जीव सोडला.
स्थानिक नेता अकुला बालकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी सरकारी डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर त्यांनी त्याला मृत घोषित केलं. लोगेशचा मृतदेह गांधी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं. तीन,चार दिवसांपासून सतत पायी प्रवास केल्यामुळे लोगेशला हा त्रास झाला. रस्त्यात देखील कोणतं साधन उपलब्ध होऊ शकलं नाही. काहींनी वाटसरू समजून खायला दिलं. काही ट्रक चालकांनी लिफ्ट दिली. पण पोलिसांनी मात्र खूप वाईट पद्धतीने या लोकांना वागणूक दिल्याचे बोलले जात आहे.