मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान दौऱ्यात त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांची ममत बॅनर्जी यांनी भेट घेतली.
दरम्यान, राजकीय वर्तुळात त्यांच्या या भेटीची चर्चा चांगलीच रंगली असून या भेटीविषयी खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून भविष्यातील रणनीतीदेखील विचारात घेतली गेली.
ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते सीबीआय, एनसीबी, ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांमार्फत दहशतवाद निर्माण करत आहेत. अशाच प्रकारचं ‘महान’ कार्य भाजप पश्चिम बंगालमध्येही करत आहे, अशी माहिती ममता दीदींनी दिली. मात्र तेथे आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रदेखील या दहशतवाद्यांशी सामना करेल, अशी खात्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.