कोलकत्ता – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोराने वाहू लागले आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज तृणमूल काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जात असताना सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याविषयी मोठी गौप्यस्फोट केली आहे.
१९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या कंधार विमान अपहरणकांड आणि ममता बॅनर्जींच्या त्यावेळच्या भूमिकेबाबत यशवंत सिन्हा यांनी सांगितले. डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणकांडावेळी ममता बॅनर्जींनी अपहृत प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे स्वत: ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
सिन्हा म्हणाले की, डिसेंबर १९९९ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेले होते. त्या आणीबाणीच्या परिस्थितीत ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस म्हणून दहशतवाद्यांकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दहशतवाद्यांनी इतर अपहृत प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडावे, अशी दहशतवाद्यांना अट घालण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. देशासाठी जे काही बलिदान द्यावे लागेल ते देण्याची तयारी त्यांनी केली होती, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
#WATCH | TMC Yashwant Sinha says, Mamata Banerjee wanted to offer herself as a hostage in exchange for passengers of the hijacked plane in ‘Kandahar incident’, for the country. pic.twitter.com/Pf1CBJGLyg
— ANI (@ANI) March 13, 2021
२४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जर्गर या दहशतवाद्यांना सोडण्याची नामुष्की भारत सरकारवर ओढवली होती.