बेंगळुरू : केंद्रातील सध्या असलेल्या सरकारमध्ये दलित नागरिकांचा आदर नाही, मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा उच्च पदावर असलेला कोणी असो अशी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. अलिकडेच एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना आणि उत्तर प्रदेशात वाल्मिकी समुदायातील एका व्यक्तीच्या कथित हत्येच्या घटनेच्या अनुशंगाने त्यांनी हे विधान केले. मनुस्मृती आणि सनातन धर्माच्या नावाखाली लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातील शांतता बिघडू इच्छिणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. वकील असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने धर्माचे नाव घेऊन भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मी वैयक्तिकरित्या, पक्षाच्या वतीने देखील याचा निषेध केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही याचा निषेध केला आहे. जरी उशिरा झाला तरी, आमच्या पंतप्रधानांनीही त्याचा निषेध केला आहे, असे खर्गे म्हणाले. धर्माच्या नावाखाली आणि समाजाला उद्ध्वस्त करण्याच्या विचारसरणीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर सरकारने कठोर कारवाई करावी. मी दुःखाने सांगतो की या घटनेनंतर वकील, सरकार, राजकीय पक्षांकडून ज्या प्रकारची प्रतिक्रिया यायला हवी होती तशी ती मोठ्या प्रमाणावर आली नाही, मात्र काही पुरोगामी राज्ये, पुरोगामी विचारसरणीचे समर्थक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याचा निषेध केला आहे, असे ते म्हणाले. सार्वजनिकरित्या या घटनेचा देशभरात मोठ्या प्रमाणात निषेध झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खर्गे यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात वाल्मिकी समुदायातील एका व्यक्तीच्या हत्येचाही निषेध केला आणि ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था किती प्रमाणात बिघडली आहे हे यावरून दिसून येते. जर त्या माणसाने काही चूक केली असती तर कायदा हातात घेण्याऐवजी गुन्हा दाखल करून त्याला अटक करता आली असती. दोन्ही घटनांचा उल्लेख करून खर्गेंनी दावा केला की आपल्याला शांत राहण्याऐवजी लढावे लागेल. जर मुख्य न्यायाधीशांच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान केला गेला असेल तर सामान्य माणूस, अधिकारी किंवा कारकून यांची काय अवस्था होईल?