Malegaon Budruk Nagar Panchayat: पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या जोरावर माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपला दबदबा निर्माण केला आहे. ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत नगरपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक, तर ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक झेप घेतली आहे. या यशाबद्दल नगरपंचायतीला तब्बल ₹३.५० कोटींचे बक्षीस जाहीर झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात माळेगावच्या या यशाची चर्चा रंगली आहे. सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम – माळेगाव नगरपंचायतीने यापूर्वीही ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या विविध टप्प्यांत आपले वर्चस्व राखले आहे. नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आलेख खालीलप्रमाणे राहिला आहे. अभियान २.०: राज्यात तृतीय क्रमांक अभियान ३.०: राज्यात तृतीय क्रमांक अभियान ४.०: राज्यात चतुर्थ क्रमांक अभियान ५.०: राज्यात द्वितीय आणि ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक असे साध्य झाले यश… नगरपंचायतीने राबविलेले प्रभावी उपक्रम या यशाचे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत. *स्वच्छता व पर्यावरण संवर्धन *घनकचरा व्यवस्थापन *वृक्षलागवड *शाश्वत विकासाचे उपक्रम माळेगावकरांसाठी अभिमानास्पद क्षण – हे यश म्हणजे केवळ प्रशासनाचा विजय नसून, शहरातील सन्माननीय नागरिक, मुख्याधिकारी, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून नगरपंचायतीचे कौतुक होत अभिनंदन करण्यात येत आहे.