Makrand Patil – भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त तसेच दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी 1976 पूर्वीच्या वीर, वरसगाव, पानशेत, भाटघर प्रकल्पांतील बाधित गावठाणांसाठी नागरी सुविधा कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या गावांतील नागरी सुविधा, प्रलंबित प्रश्न तसेच दरडप्रवण क्षेत्रातील गावांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली. राजगड तालुक्यातील गुंजवणी, पानशेत, वरसगाव प्रकल्पबाधित सुमारे 18 गावांमधील समस्या तसेच कोदापूर ग्रामपंचायतीअंतर्गत गावांतील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली आणि मुळशी तालुक्यातील घुटके आदी दरडप्रवण गावांतील नागरिकांच्या सुरक्षितता व स्थलांतराबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे मांडेकर यांनी सांगितले. पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा आणि पायाभूत सोयींचा अभाव असल्याने त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीस मदत व पुनर्वसन विभाग, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, अमोल नलावडे, विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, भोरचे उपसभापती विशाल कोंडे तसेच इतर पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.