प्रभात वृत्तसेवा सातारा – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन कामाला सुरुवात करावी. ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक हॉटेल लेक व्ह्यू येथे मंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, नितीन भरगुडे- पाटील, उदय कबुले, उदयसिंह पाटील, संजय देसाई, शिवरुपराजे खर्डेकर, प्रतापराव पवार, किसनशेठ शिंदे,पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. मकरंद पाटील म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असून आता आपण पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अनेक अनुभवी नेत्यांना आपल्या सोबत घेत आहोत. आगामी काळात आणखी काही लोक आपल्या सोबत येणार आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वांनी एकजुटीने कामाला सुरुवात करायला हवी. जेणेकरून पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यास मदत होईल. ज्या तालुक्यात अद्याप आपले पदाधिकारी सक्रिय झाले नाहीत त्यांनी तातडीने सक्रिय व्हावे व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाचे ध्येयधोरणे व घेतलेले महत्वपूर्ण निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावे.’’बाळासाहेब सोळसकर यांनी पक्षाची वाटचाल आणि जिल्ह्यात सुरु असलेली पक्षप्रवेश आणि संघटनाबांधणीचा आढावा प्रास्ताविकात घेतला. संजय देसाई यांनी स्वागत केले. सर्व तालुकाध्यक्षांनी कामाचा अहवाल देताना निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले. श्रीनिवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले. यावेळी किसनशेठ भिलारे, प्रवीण भिलारे, महादेव मस्कर, सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, सुनील शिंदे, नासीर मुलाणी, विजयसिंह यादव, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते.