नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात आज मेजर जनरल पातळीवरील चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशातील प्रत्यक्ष ताबारेषवरून निर्माण झालेल्या तणावावर मार्ग काढण्यासाठी ही चर्चा होत असून त्यात दौलत बेग ओल्डी आणि पूर्व लडाखमधील देसपांग येथील तणावाच्या मुद्द्याचाही समावेश आहे. दौलत बेग ओल्डी येथे चीनच्या हद्दीत ही बैठक झाली.
गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यातील लष्करी पातळीवरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांतील कमांडर पातळीवरही एकूण चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. त्यांनतर आता ही मेजर जनरल पातळीवरील चर्चा सुरू झाली आहे. पूर्व लडाखमधील सर्व भागात पूर्वीचीच स्थिती कायम ठेवावी आणि तेथील लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया चीनने त्वरित पूर्ण करावी, असा आग्रह भारतीय बाजूकडून सतत धरला जात आहे.
पूर्व लडाखमध्ये 5 मे पासून तणाव निर्माण झाला आहे. त्या दिवसापर्यंत लष्कराची जी स्थिती होती तीच कायम ठेवली जावी, अशी भारताची अपेक्षा आहे. चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चीनने गलवान खोऱ्यातील आपले सैन्य मागे घेतले आहे. तसेच अन्यही काही भागातून त्यांनी आपले सैन्य मागे घेतले आहे. तथापि, फिंगर चार ते फिंगर आठ या भागातील सैन्यही चीनने मागे घ्यावे, अशी भारताची मागणी आहे. ती त्यांच्या लष्करापुढे सातत्याने ठेवली जात आहे.
दरम्यान, ही तणावाची स्थिती कायम असल्याने भारतानेही आपल्या बाजूने सर्वत्र लष्कराची सज्जता ठेवली असून लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनीही या सज्जतेचा सातत्याने आढावा घेतला आहे.