Breaking news : वर्षा बंगल्यावर मोठी खलबते.! फडणवीस यांच्यासोबत ‘या’ नेत्यांची रंगली चर्चा
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून वर्षा बंगल्यावर खलबते सुरू आहे.

Breaking news – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून वर्षा बंगल्यावर खलबते सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जवळपास सव्वा तास चर्चा केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजितदादांकडे ज्या महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी होती, ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मंत्र्यांना मिळावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये, यासाठी या रिक्त जागांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ही बातमी वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
अजितदादांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार का? या प्रश्नावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत सुनेत्रा वहिनींच्या नावाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. शक्य झाल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही पवार कुटुंबाशी संवाद साधू, असे त्यांनी नमूद केले.
प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, पण तो घाईत घेतला जाणार नाही. पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन, सर्वांच्या आणि जनतेच्या भावना विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा :
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास





