Majhi Kanya Bhagyashree Yojana : मुलगी जन्माला आल्यानंतर लगेच होणार लखपती ; ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ याविषयी जाणून घ्या सर्वकाही

Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार चालवत आहे. तर इतर अनेक योजना राज्य सरकारही राबवत आहेत. या योजनांतर्गत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च समाविष्ट केला जातो. अशीच एक योजना राज्य सरकार राबवत आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये देते.
माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) एप्रिल 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजना कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत लाभ घेता येणार आहे.
सुकन्या योजनेचा समावेश नव्याने सुरू करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेत करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये लागू करण्यात येत आहेत. तसेच सुकन्या योजनेतील मुलींना माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. यावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. याशिवाय, मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50 हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25-25 हजार रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) असणे आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक (Bank Account Passbook), मोबाईल फोन नंबर. पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पत्ता (Resident Address Proof) पुरावा असावा. यासोबतच उत्पन्नाचा दाखलाही (Income Proof) आवश्यक आहे. तिसरे अपत्य असले तरी, या योजनेंतर्गत फक्त दोन मुलींच्या नावाने लाभ घेता येतो.
या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपं आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो काळजीपूर्वक वाचून भरावा लागेल. जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.
माझी कन्या भाग्यश्री योजनेतील नियम आणि अटी
* मुलीचे आई-वडिल महाराष्ट्रातील रहिवासी असावेत
* योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
* विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित आवश्यक
* या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
* दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
* बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना लागू आहे
* एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल.





