शिमला : हिमाचल प्रदेश पोलिसांनी २०२२ मध्ये राज्यात उघडकीस आलेल्या २,५०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एकाला कोलकाता येथून अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असलेल्या आरोपी मिलन गर्ग (३५) याला बुधवारी रात्री कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थायलंडमधील बँकॉकला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडण्यात आले. बनावट क्रिप्टोकरन्सीच्या डिझाईन आणि मार्केटिंगमध्ये गर्गला नंतर शिमल्यात आणण्यात आले. घोटाळा उघडकीस आल्यानंतर आधी दुबईला पळून गेलेला गर्ग जूनमध्ये भारतात परतला होता आणि कोलकाता विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो पुन्हा देश सोडून जात होता. हजारो लोकांची फसवणूक करणारा क्रिप्टोकरन्सी घोटाळा २०१८ मध्ये सुरू झाला परंतु २०२२ मध्ये उघडकीस आला कारण फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणूकदारांना तोंड बंद ठेवण्याची किंवा पैसे गमावण्याची धमकी दिली होती. त्याबदल्यात पैसे न मिळाल्याने गुंतवणुकदारांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली, पण फसवणूक करणाऱ्यांविरोधात फसवणूक झालेल्या व्यक्ती उघडपणे समोर आल्या नाहीत. तथापि, नंतर शेकडो पीडितांनी पुढे येऊन घोटाळेबाजांची कार्यपद्धती उघडकीस आणली आणि आतापर्यंत या संदर्भात ३०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २६ जणांना अटक केली असून आतापर्यंत ७० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या काही मुख्य आरोपींमध्ये हेमराज, सुखदेव हे दोघे मंडी येथील आणि अरुण गुलेरिया आणि अभिषेक हिमाचलच्या उना जिल्ह्यातील आहेत. घोटाळेबाजांनी अल्पावधीतच भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे जाळे तयार केले. पोलिस आणि शिक्षकांसह समाजातील विविध स्तरातील लोक लवकर परताव्यासाठी योजनेत सहभागी होते. या घोटळ्यासाठी तीन ते चार प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आणि क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये फेरफार करून फुगवलेल्या खोट्या वेबसाइट तयार केल्या गेल्या, फसवणूक करणाऱ्यांनी स्थानिक पातळीवर बनवलेल्या (मंडी जिल्ह्यात) कोर्विओ कॉईन किंवा केआरओ कॉइन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीशी संबंधित गुंतवणूक योजना घेऊन लोकांशी संपर्क साधला, असे पोलिसांनी सांगितले. क्रिप्टो घोटाळ्यासाठी वापरण्यात आलेल्या वेबसाइटवर सुमारे अडीच लाख वेगवेगळे आयडी होते. आरोपींनी योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चुकीची माहिती, फसवणूक आणि धमक्यांचा वापर केला ज्यामुळे पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि हजाराहून अधिक पोलीस कर्मचारीही या फसवणुकीला बळी पडले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.