राजगुरूनगर -मंदोशी येथील तळपेवाडी व जावळेवाडी येथे चक्रीवादळात नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या घरांची प्रशासन व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असून नुकसानग्रस्त कुटुंबाना मदत करण्यात येणार आहे.
सोमवारी (दि. 11) दुपारी मंदोशी परिसरात झालेल्या वादळात तळपेवाडी, जावळेवाडी मधील 20 पेक्षा जास्त नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले. जावळेवाडीला वीज पुरवठा करणारे विजेचे सहा खांब जमीनदोस्त झाले. दैनिक प्रभातमध्ये या गावातील चक्रीवादळाचा आढावा आणि नुकसानीबाबत बातमी व डिजीटल प्रभातवर व्हिडिओ विशेष बातमी प्रसिद्ध झाली होती.
त्याची खेड महसूल प्रशासन, या भागाचे राजकीय प्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व पंचनामे केले आहेत. यामध्ये खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, माजी जि.प. सदस्य अरुण चांभारे यांनी भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान या चक्रीवादळात नुकसान झालेल्या कुटुंबांना खेड पंचायत समितीच्या वतीने व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून किराणा किटचे वाटप करण्यात आले.
चक्रीवादळामुळे तळपेवाडी व जावळेवाडीमध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर नुकसान झालेल्या घराच्या दुरुस्तीसाठी साहित्य देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष डोळस, सरपंच बबन गोडे आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाला सीएसआर फंडातून घर दुरुस्तीसाठी तात्काळ मदत केली जाईल, असे जि.प. सदस्य अतुल देशमुख, माजी उपसभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले.