वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा वर्धायेथे आयोजित करण्यात आली होती. यावेळेस नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवल्याची चर्चा रंगली होती. मात्र आणखी चर्चा रंगली ती मोदींच्या सभेला असलेल्या रिकाम्या खुर्च्यांची. सभेसाठी पन्नास हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यातील अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मला आशीर्वाद देण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झोप लागणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र रिकाम्या खुर्च्या कसा आशीर्वाद देणार ? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, “वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की. २०१४ साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे”, असा चिमटा त्यांनी काढला.
दरम्यान, राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची विकेट काढली आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केली. यावर बोलताना मुंडे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे.