Maharashtra economy: नवकल्पना, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप्स आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर पुढील दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील इमॅजिनएक्स २०२६ कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सध्या ६६० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारे देशातील सर्वात जवळचे राज्य आहे. “महाराष्ट्राची तुलना आता इतर राज्यांशी होत नाही. राज्य आधीच जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. पुढील दोन-तीन वर्षांत सिंगापूर आणि यूएईच्या अर्थव्यवस्थेलाही महाराष्ट्र मागे टाकेल,” असे ते म्हणाले. दशकात तिप्पट वाढ – (Maharashtra economy) फडणवीसांनी सांगितले की, २०१५ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे १४ लाख कोटी रुपयांची होती. ती आता ५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून गेल्या दशकात तिप्पट वाढ नोंदवली आहे. राज्याचा सरासरी विकासदर सुमारे १० टक्के राहिला असून एल निनोसारख्या तात्पुरत्या अडचणी असूनही २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Maharashtra economy: लवकरच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि यूएईला मागे टाकेल: सीएम फडणवीसांचा मोठा दावा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्न राजधानी बनला आहे. संशोधन, नवकल्पना आणि आर्थिक विकासातही राज्य आघाडीवर आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे राज्याच्या विकासाचे “फोर्स मल्टिप्लायर” ठरत असल्याचे ते म्हणाले. हेही वाचा – शेअर बाजारात तेजी; बँकिंग शेअर्सच्या जोरावर सेन्सेक्स 231 अंकांनी वधारला, रुपयालाही दिलासा गुन्हे अन्वेषण प्रक्रियेतही AI आधारित प्रणाली राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र विभाग आणि आयुक्तालय स्थापन केले असून प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात AI चा वापर वाढवण्यात येत आहे. गुन्हे अन्वेषण प्रक्रियेतही AI आधारित प्रणाली वापरली जात असून गुन्ह्याच्या तपासापासून आरोपपत्र दाखल होईपर्यंतची प्रक्रिया डिजिटल आणि ब्लॉकचेन-आधारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन दृष्टीपत्राचाही फडणवीसांनी उल्लेख केला. २०३० साठी अल्पकालीन, २०३५ साठी मध्यमकालीन आणि २०४७ साठी दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘व्हिजन मॅनेजमेंट युनिट’ स्थापन करण्यात आले असून विविध विभागांसाठी दोन हजार डेटा पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. रिलेशनशिप मॅनेजर आणि ‘वॉर रूम’ यंत्रणा कार्यरत – गुंतवणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सामंजस्य करारांचे (MoU) प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचे प्रमाण ५५ ते ६० टक्के आहे, तर राष्ट्रीय सरासरी ३५ टक्के आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत झालेल्या करारांपैकी ८५ टक्के करारांची अंमलबजावणी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गुंतवणूक प्रस्तावासाठी रिलेशनशिप मॅनेजर आणि ‘वॉर रूम’ यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रातही AI चा वापर – शेती क्षेत्रातही AI चा वापर वाढवण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी ‘महाविस्तार’ अॅपचा उल्लेख केला. हे अॅप ५० लाख शेतकऱ्यांनी डाउनलोड केले असून AI आधारित कृषी सेवा त्यातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. भिल्ल आदिवासी भाषेलाही या अॅपमध्ये समर्थन देण्यात आल्याने आदिवासी शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताची ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. त्यामुळे AI स्वीकारणे भारतासाठी कठीण ठरणार नाही,” असेही फडणवीस म्हणाले.