Weather Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानात झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आणि कोल्हापूरसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढू लागला आहे. विशेषतः सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबईमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईत उष्णतेची लाट पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकण किनारपट्टीकडे वाहू लागल्यामुळे महामुंबई परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये 11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून 12 आणि 13 मार्चपासून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड परिसरात तापमान 40 ते 42 अंशांदरम्यान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यभरात उकाडा वाढला बुलढाणा जिल्ह्यात तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे तापमान 41 अंशांच्या पुढे गेले आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उकाडा वाढला असून तापमान 39 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर अकोला येथे तापमान 40 अंशांहून अधिक नोंदवले गेले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 36.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी आरोग्यासोबतच शेती पिकांवरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गहू, भाजीपाला आणि फळबागांना उष्णतेचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे, मल्चिंग (अच्छादन) तंत्राचा वापर करणे आणि खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन कुंदेवाडी गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. भरत मालुंजकर यांनी केले आहे. आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.