Maharashtra Weather: राज्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भातील अनेक जिल्हे अक्षरशः होरपळून निघाले आहेत. मंगळवारी अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यात पारा ४६.५ अंशांवर पोहोचला. नागपूर, अकोला, यवतमाळसह अनेक भागांत तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. उष्ण व कोरडे वारे आणि ढगाळ वातावरणाचा अभाव यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. नागपूर येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले की, “यंदा विदर्भात उष्णलाट दीर्घकाळ टिकून आहे. पूर्वी काही दिवसांनी वातावरणात बदल होत असे, मात्र यंदा सलग सात ते आठ दिवस तापमान ४५ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहात आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे.” उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. शीतपेये, उसाचा रस, लिंबूपाणी आणि थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली असून विजेच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, देशभरातही उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४८.२ अंश तापमानाची नोंद झाली. दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्येही तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून अनेक राज्यांमध्ये उष्णलाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे देशातील वीज मागणीनेही विक्रमी पातळी गाठली आहे. मंगळवारी देशाची कमाल वीज मागणी २६०.४५ गिगावॅटपर्यंत पोहोचल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली.