नागपूर :- राज्यातील गुणवत्ता नियंत्रण पथकांनी कारवाई करीत आतापर्यत खते, बियाणे व किटकनाशकांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामुळे राज्यातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहाणार असल्याची माहिती राज्याचे संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अविनाश पाटील यांनी दिली. राज्यात आतापर्यत खते, बियाणे व किटकनाशकांचा एकूण 340.15 मे. टन साठा जप्त करण्यात आला असून 356 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर 1289 विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात तणनाशक बियाण्याच्या विक्रीला परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. राज्यात जादा दराने कापूस बियाण्यांची विक्री केल्याबद्दल चार बियाणे उत्पादक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. राज्यात या हंगामासाठी 2 कोटी 3 लाख कापूस बियाण्यांची पाकिटे पुरवण्याचे नियोजन केले आहे. त्या नुसार 21 जूनपर्यत 1 कोटी 84 लाख कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांतर्फे करण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. चालु खरीप हंगामात नऊ जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांची 1 कोटी 53 लाख 57 हजार रूपयांची 3742 पाकिटे आणि 14,231 सुटे बियाणे जप्त करण्यात आले आहे. शेजारील राज्यांतून विक्री… राज्यात तणप्रतिबंधक बीटी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी असली तरी शेजारील राज्यातून आणून राज्यात बियाण्यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्ये साठा करून गुपचुप विक्री करण्यात येते. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकांमार्फत अशा चोरट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र अशी कारवाई करण्यात येत आहे. या शिवाय खते व किटकनाशकाचा अवैध साठा करणाऱ्या विक्रेत्यांविरूद्धही कारवाई करण्यात येत आहे. राज्यात 98 टेक्क् क्षेत्र बीटी कापसाखाली राज्यात 41.29 लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली असून त्यात जवळपास 98 टक्के क्षेत्र बी. टी. कापसाखाली आहे. खरीप हंगामाकरीता 1 कोटी 60 लाख बीटी पाकिटे वापरली जातात. सरासरी हेक्टरी 475 ग्रॅम वजनाची चार ते पाच पाकिटे लागतात. राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, परभणी, नंदुरबार, अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथे एचटीबीटी विक्रेत्यांविरोधात पोलिस केसेस दाखल करण्यात आल्या आहे.