Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढला!; रेड अलर्ट, मेळघाटातील 20 गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain Alert: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नांदेडला रेड अलर्ट जारी. मेळघाटातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला असून भंडारा आणि गडचिरोलीतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.

Maharashtra Rain Alert: मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढू लागला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून विदर्भातील अनेक भागांमध्येही जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जालना जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस –
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत होते. मात्र गुरुवारी जालना, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांवरील उघडीपाचा ताण कमी होण्यास मदत होणार असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट –
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
मेळघाटात पूरस्थिती; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला-
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला पूर आला आहे. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने 20 ते 25 गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मेघा नदीलाही पूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडाऱ्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस-
भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असतानाच दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. तुमसरमध्ये तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले.
भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पवनी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
गडचिरोलीत अनेक मार्ग बंद-
गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पेट्रोल पंपही पाण्याखाली गेला आहे.
जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पूरपाणी आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल १८ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.





