मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत त्यांच्याकडे राजकारणातून निवृत्त होऊन उर्वरीत काळ मनन चिंतनात घालवण्याचा आपला इरादा व्यक्त केला आहे. राजभवनाकडून त्यांच्यावतीने आज एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यांचे हे निवेदन म्हणजे राज्यपालपदाचा त्यांनी थेट राजीनामाच दिला असल्याचे संकेत मानले जात आहेत.
या निवेदनात कोश्यारी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रासारख्य संतांच्या आणि शूरविरांच्या भूमीत राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ आपण राज्यसेवक म्हणूनच काम केले. या काळात राज्यातील जनतेचे मोठे प्रेम मिळाले. जनतेची ही आपुलकी कधीही विसरता येणार नाही.
माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 23, 2023
पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांना आपण निवृत्तीची इच्छा बोलून दाखवली आहे. जीवनातील उर्वरीत काळ आपण अध्ययन, मनन आणि चिंतनात घालवू इच्छितो असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.
Uttar Pradesh : भाजप राजवटीत देशाची कमालीची पिछेहाट – अखिलेश यादव
पंतप्रधान मोदींचा आपल्याला विशेष स्नेह मिळाला आहे, यापुढेही त्यांचे आशिर्वाद मिळतच राहतील असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी राजभवनातर्फे अधिकृतपणे हे निवेदन जारी करणे म्हणजे त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामाच दिला असल्याचे मानले जात आहे. तथापि त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही.