Pharmacy strike: ई-फार्मसींच्या वाढत्या व्यवसायाविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांनी २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्रातील किरकोळ औषध विक्रेता संघटनांनी पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात औषध दुकाने सुरू राहणार असून नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत मिळणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ई-फार्मसी संदर्भातील किरकोळ औषध विक्रेत्यांच्या तक्रारी आणि मागण्यांचा आढावा घेत आहे. AIOCDच्या प्रतिनिधींनी नुकतीच राष्ट्रीय औषध नियामक संस्थेची भेट घेऊन ई-फार्मसींच्या कार्यपद्धतीबाबत चिंता व्यक्त केली होती. आश्वासनानंतर बंद मधून माघार – सीडीएससीओने या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेत नियामक चौकट तपासली जात असल्याचे आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील संघटनांनी बंदात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा – ‘या’ तारखेपासून उष्णता कमी होणार; भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती सूत्रांच्या मते, औषध दुकाने बंद राहिल्यास नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना मोठा फटका बसू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब आणि इतर दीर्घकालीन आजारांवरील रुग्णांना जीवनावश्यक औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील संघटनांनी सार्वजनिक हिताला प्राधान्य दिले आहे. या राज्यांची संपातून माघार – महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाखमधील औषध विक्रेता संघटनांनीही बंदात सहभागी होणार नसल्याचे लेखी कळविले आहे. सीडीएससीओच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि औषधांची अखंड उपलब्धता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले असून, क्षेत्रातील समस्या संवादातून सोडविण्यावर भर दिला जाईल, असे नमूद केले.