Maharashtra congress News : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची प्रक्रिया सुरू झाली असून पक्षाने आता थेट बूथ स्तरावर लक्ष केंद्रित करत ‘संघटन सृजन अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही मोहीम पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून, ३७ केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील तब्बल १८३ दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. यात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि नितीन राऊत यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. हे नेते थेट जिल्हा आणि बूथ स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनेला नवसंजीवनी देणे, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे केवळ नावापुरते सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या अभियानात पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांपासून ते बूथ कमिट्यांपर्यंत सर्व नियुक्त्या मेरिटच्या आधारावर केल्या जाणार आहेत. ‘आपला माणूस’ संस्कृतीला आळा घालण्यासाठी थेट दिल्लीकडून देखरेख ठेवली जाणार आहे. महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी देऊन संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यावर पक्षाचा भर आहे. गटबाजी कमी करणे, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप करणे आणि कॅडर बेस मजबूत करणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. एकूणच, सत्ताधाऱ्यांच्या मजबूत निवडणूक यंत्रणेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने ‘सृजन’ हे नवे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला असून, या बदलांचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.