Dilip Walse Patil : ‘1500 मतांनी जिंकून आलोय अन मंत्रिपद मागू का?’, दिलीप वळसे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

Dilip Walse Patil on Minister Post: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला होता. खातेवाटपाशिवायच राज्यातील हिवाळी अधिवेशनही पार पडले. अधिवेशन पार पडताच खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 42 जणांची नावे या यादीत आहे. मात्र, अनेक बड्या नेत्यांना मंत्रीपद मिळालेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ व राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील मंत्रीमंडळात स्थान मिळालेली नाही. छगन भुजबळांनी जाहिरपणे याविषयी नाराजी व्यक्त केली होती. तर वळसे पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले होते. त्यातच आता वळसे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.
‘विधानसभेला अवघ्या 1500 मतांनी विजयी झालो आहे. 1500 मतांनी विजयी झाल्यानंतर आता मला मंत्री करा अशी मागणी करू का?’, असे वक्तव्य करत वळसे पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी साहेबांना मंत्री करा, अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना वळसे पाटील यांनी हे वक्तव्य केले.
दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून 1523 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या देवदत्त निकम यांचा पराभव केला. दरम्यान, मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, दिलीप वळसे पाटील यांनी ‘पक्षावर माझी काहीही नाराजी नाही, पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.




