अयोध्येत साकारणार महाराष्ट्र भवन; मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या म्हणजेच भक्त निवासाच्या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी अप्पर सचिव मनीषा म्हैसकर, अयोध्येचे आमदार, खासदार उपस्थित होते.
अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालकराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली. भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन स्थापनेसाठी 2.327 एकर भूखंड दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील पाहुणे, भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी सुमारे 260 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाकडून अयोध्येत राष्ट्रीय महामार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फील्ड टाऊनशिप विकसित केली जात आहे.
या जागेवर हा भूखंड उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंडांच्या संपादनासाठी सार्वजनिक विभागाकडून 67.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि इतर सुविधांसाठी अंदाजे 260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर
अयोध्येतील प्रस्तावित महाराष्ट्र सदनापासून श्री रामजन्मभूमी मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर आहे. तर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन अयोध्या धाम रेल्वे स्थानकापासून 4.5 किमी अंतरावर बांधले जात आहे. अयोध्येतील नवनिर्मित महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 किमी अंतरावर महाराष्ट्र सदन तयार होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अयोध्येतील प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र सदनासाठी 76 कोटी रुपयांची जमीन देण्यात आली आहे.





