Ajit Pawar Death : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आज सकाळी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या या निधनाच्या बातमीने राज्यभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक राजकीय नेतेमंडळींना अश्रु अनावर झालेत. तसेच नेतेमंडळींकडून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. यातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांची पोस्ट चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले की, “अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच… अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती… एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला. त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं. Ajit Pawar Death : पण अजितदादा फक्त राजकारणी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही जवळून पाहता आले. कठोर, कठीण निर्णय घेताना ते कधी डगमगले नाहीत. प्रशासनातील अधिकारी असो वा पक्षाचा कार्यकर्ता, चुकीचं वागण्या-बोलणाऱ्याला त्यांनी नेहमीच खडेबोल सुनावले. पण व्यक्ती, राजकारणी म्हणून प्रसंगी कटू बोलणाऱ्या अजितदादांचा स्वभावाला आणखी एक किनारही होती. मिश्कीलपणाची. प्रसंगी एखाद्याला चार शब्द सुनावताना अजितदादा पटकन असं काही तरी बोलायचे की, त्यांची बोलणी खाणाराही नकळत हसायचा. अजितदादांचा आणखी एक पैलूही नेहमीच लक्षात राहील. त्यांचं बारामती, जन्म-कर्मभूमीवरचं प्रेम. अगदी तरुण वयातच त्यांनी जिथून सामाजिक-राजकीय कारकीर्द सुरू केली, ती बारामती त्यांच्यासाठी नेहमीच खास होती. राजकारणातली एक-एक पायरी चढून वर येताना अजित पवारांचे अजितदादा झाले. त्यांनी स्वतःची, स्वतंत्र ओळख निर्माण केली ती, सामाजिक-राजकीय कार्यातून. तीच त्यांची खरी ताकदही होती. अजितदादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःची बलस्थानं नेमकी ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी नेहमी महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं. बारामती, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीच ते नेहमी झपाटून काम करत राहिले. एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं. आज अजितदादा आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाहीये. अजितदादा, तुमचा राजकीय प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील. तुमचं हे असं अकाली जाणंही नेहमीच अस्वस्थ करेल… परमेश्वर पवार कुटुंबाला, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!’ Ajit Pawar Death : सत्तेत असो व विरोधात ‘दादा’ नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी; भल्या पहाटे कामाची सवय ते सात वेळा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड…