मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले तर मविआला मोठ्या प्रमाणात धक्का बसला. या सगळ्या पराभवावर अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निकालावर थेट प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेच प्रवक्ते संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या पराभवावर मोठे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले संजय राऊत? “या निवडणुकीमध्ये मतविभागणी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात मतविभागणीसाठी त्यांनी अडथळे निर्माण केले. स्वत:पेक्षा मतविभागणीवर जास्त लक्ष दिलं आणि त्याचा फटका आम्हाला बसला. मनसे, वंचितचं मॅनेजमेंट करुन आमचे उमेदवार पाडण्यात आले. हे चित्र तुम्ही मुंबईसहीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघू शकता,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी काय तीर मारला आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे लोक, स्वयंसेवक घराघरात जाऊन वेगळ्याप्रकारचा विषारी प्रचार करत राहिले. लोकांची मन आणि मतं भरकटवली. त्याचा काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसलं. आमची चाचपणी करत आहोत,” असंही राऊतांनी सांगितलं.