Maharashtra Assembly Election 2024 – राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता मुख्यमंत्री कोण? येथे महायुतीचे घोड अडल्याचे पाहायला मिळत आहे. आधी शपथविधी 25 तारखेला होणार होता, पण आता सत्ता स्थापनेचा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा, असा सूर शिवसेनेतून आळवला जात आहे, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी ठराव समंत केल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असे म्हटले आहे. जसे बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, अगदी तसेच हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आणि तेच मुख्यमंत्री झालेत. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करत नाही, असे मला वाटते, सर्व योजना आणि शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून शिंदेच मुख्यमंत्री होतील, असे मला वाटते, असे नरेश म्हस्के म्हणाले. शिवसेनेमधून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा सूर आळवला जात आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रिपदी कायम राहावे, अशी इच्छा व्यक्त होत आहे. निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री केले जावे, यासाठी जोरदार बॅटिंग सुरू आहे. नरेश म्हस्के, संजय शिरसाट, भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले जावे, यासाठी महायुतीच्या मित्रपक्षांना साद घातल्याचे पाहायला मिळत आहे.