Maharashtra Accident : नाशिक पाठोपाठ पंढरपूरातही कार कालव्यात पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पंढरपूरच्या नातेपुते-निरा उजव्या कालव्यादरम्यान घडली. या कारमधील प्रवासी मूळचे सातारा जिल्ह्यातील दुधबावी येथील असल्याची माहिती मिळत आहे. ते मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते. पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक कार अचानक कालव्यात कोसळली. ही कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ३ जणांना वाचवण्यात यश आले नाही. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे हा अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज आल्याचेही सांगितले जाते. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गाडीचालक सुनील टिळेकर हा अपघातामध्ये बचावला असल्याची माहिती मिळत आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात एका उघड्या विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये सहा मुलांचा समावेश होता. मृत सर्व दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबाचे सदस्य होते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दिंडोरी शहरातील शिवाजी नगर भागात हा अपघात घडला. मृत व्यक्तींची ओळख सुनील दरगुडे (३२), रेश्मा दरगुडे, आशा अनिल दरगुडे (३२) आणि कुटुंबातील सहा मुले ज्यामध्ये ७ ते १४ वयोगटातील पाच मुली आणि ११ वर्षांच्या एका मुलाचा समावेश होता. या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील उघड्या विहिरींचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.