– संदेश भिसे
महाबळेश्वर – निसर्गसौंदर्याच्या आविष्काराने नटलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गाचे मोठे नुकसान करणारा वणवा लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभागाने महाबळेश्वर परिसरात जाळ रेषा काढण्याचा उपक्रम राबविला.
महाबळेश्वरचा बराचसा भाग जंगलाने वेढला असून विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. तसेच विविध प्रकारचे वन्यजीवांचे अधिवास या भागात आढळतात. एप्रिल- मे महिन्याच्या दरम्यान बऱ्याचदा गवताळ भागात काहींकडून वणवे लावले जात असतात.
यामुळे येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असते. सावधानता म्हणून महाबळेश्वर वन विभागाकडून येथील वेण्णा लेक, लाॅडविक पॉइंट येथे जाळपट्टा मारण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक रमेश गडदे, लहू राऊत, अभिनंदन सावंत तसेच वनमजूरांच्या मदतीने ठिकठिकाणी जाळ रेषा घेण्यात आल्या. प्रत्येक गावातील लोकांनी वणवा लागू नये याची खबरदरी घ्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.