दत्ता पवार
14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून जगभर साजरा होतो. प्रेमाचा दिवस अनेकांच्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येतो. कळीचे फूल व्हावे तसे आयुष्यात नवे फूल उमलते. पण दुसऱ्या बाजूने प्रेमाचा मुखवटा खरा की खोटा हे ही जाणून घ्यावे अन्यथा जीवन फुलण्याच्या आत कोमेजून जाऊ शकते. या प्रेम दिनाविषयी…
प्रेम ही ईश्वराने मानवाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आयुष्यात खरं प्रेम मिळणेही खूपच महत्त्वाचे असते. अचानक त्याला “ती’ आवडू लागते आणि तिलाही “तो’ आवडू लागतो. आनंदाला पारावार राहात नाही. आपण एकटेच स्वतःशीच हसतो. जगातले सर्व काही मिळाल्याची भावना निर्माण होते. एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. हृदयामध्ये जोरात धडधड चालू होते. एक दिवस बोलणे झाले नाही तरी चुटपूट लागून राहते. तिचा हात हातात घेतल्याशिवाय राहवत नाही. झोप उडते. तिचा चेहरा चंद्रच जणू भासतो. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आपण कवी नसतानासुद्धा आपल्यातला कवी जागा होतो. मग त्या कवितेतून कधी ती चंद्र बनून येते, कधी ती चांदण्या बनून येते, कधी चंद्रावरचा डाग तिच्या गालावरचा तीळ बनून येतो. कधी- कधी तर हद्दच होते आणि चक्क ती स्वप्नात येते.
ती जेवली तरच आपण जेवायचं. ती नाही जेवली तर आपण पण नाही जेवायचं, मग तिने लटक्या रागाने म्हणायचं की “तू जेवणार आहेस की नाहीये’ आणि मगच आपण जेवायचं. कारण तिला त्याचा आणि त्याला तिचा ध्यास लागलेला असतो. मग “सेम-सेम’ होतं. मग सुरू होतं चोरून-चोरून भेटणं. तिला भेटायला तो तब्बल दोन तास अगोदरच येऊन थांबतो. “ती’ भेटल्यावर आताच आलोय असं सांगायचं. कधी-कधी तिनेही आपल्यासाठी एक तास आधी यायचं आणि भेटल्यावर आताच आलेय असं सांगायचं. बसस्थानकात अशा शेकडो बस तिच्यासाठी सोडायच्या पण तिला नाही सोडायचं. कधी भेट नाही झाली किंवा बोलणं नाही झालं तर उगाचच मन उदास होते. अश्रू अलगद बाहेर येतात.
असं म्हटलं जातं की जुने ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही म्हणूनच ती आपल्या आयुष्यात आलेली असते. कधी कधी उचकी पण लागते. मग नंतर आपण तिला विचारायचं की “तू माझी आठवण काढली होतीस का?’ तिने आश्चर्याने विचारायचं की, “तुला कसं माहिती?’ आपण म्हणायचं, “उचकी लागली होती ना’. असं हे प्रेम असतं.
मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे “तुमचं आमचं सेम सेम असतं’. प्रेमाला जात, पात, धर्म, प्रांत, विवाहित, अविवाहित अशा मर्यादा नसतात. अगदी सीमारेषा अर्थात “लाइन ऑफ कंट्रोल’ नसतात. कारण प्रेम ही एक निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल अशी भेट आहे. ती एक पवित्र भावना आहे. प्रेम आयुष्यात एकदातरी करून बघावं. कोणावर तरी जीव लावून बघावा. कोणासाठी तरी आज लवकर निघावं. प्रेम आयुष्यात एकदा तरी करून बघावं. खरं प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होतं. म्हणून आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. तयार होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आणि नात्यामागे काहीतरी कारण असतं. नाहीतर करोडोंची आबादी असणाऱ्या देशात याच व्यक्तीशी आपली ओळख का होते? कोण घडवून आणतं हे? याचा मास्टर माइंड अर्थात सूत्रधार कोण? याचे उत्तर या जगात कोणीही देऊ शकत नाही.
पण प्रेमाची दुसरी बाजू आपण बघत नाही. या जगात प्रत्येक जण खरं प्रेम करत नसतो. प्रेम करणारे खूप असतात पण ते निभावणारे फार थोडेच आढळून येतात. प्रेमाच्या प्रांतात “सोडून जाणे’ हा विषयच नसतो. कारण जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ती कधीच आपल्या आवडत्या व्यक्तीला दुःखाच्या सागरात सोडून जात नाही. जी व्यक्ती सोडून जाते तिने आपल्यावर खरं प्रेम केलेलं नसतं. ते एक नाटक असतं. ज्यात आपण फसले जातो आणि पर्यायाने बरबाद होतो.
जिचं आपल्यावर खरं प्रेम असतं ती व्यक्ती कितीही संकटे आली तरी धरलेला हात कधीच सोडत नाही. जी व्यक्ती धरलेला हात सोडते ती धोकेबाज असते. अशावेळी खूप असह्य मनःस्ताप, दुःख, यातना होतात. शेकडो सूर्य उगवले आणि मावळले तरी आठवणींचा एकच सूर्य आपल्या आयुष्यातून मावळायचे नाव घेत नाही. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं किंवा निदान तसं नाटक करावं आणि जन्मभर साथ देण्याची शपथ घ्यावी. अचानक एक दिवस आपल्यावर बेछुट आरोप करावेत. स्वतःच्या कुटुंबीयांपुढे आपली मानहानी करावी, असे अनेक प्रसंग घडतात आणि यापेक्षा मोठी वेदना नाही, म्हणून तरुण-तरुणींनी प्रेम आंधळं असले तरी ते डोळसपणे करावं. कोणावर इतका विश्वास ठेवू नये की, आपल्या मनात आत्महत्याच्या विचारांनी घर करावं. कोणामध्ये इतकं गुंतू नये की आपल्याला त्यातून बाहेर यायचाच विसर पडावा. कोणावर इतके प्रेम करू नये की त्यानं आपल्या भावनांशी खेळून निघून जावं. ती सोडून जाणारी व्यक्ती तिकडे खूश असते आणि आपण इकडे आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतो.
त्यामुळे तरुण-तरुणींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रेम करणारे खूप आहेत पण निभावणारे खूप कमी असतात. जो आपल्या प्रेमाला सोडून जातो तो आयुष्यभर पश्चाताप करत राहतो. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी, जी जीवाच्या पलीकडची नाती तयार होतात. ती जीवाच्या पलीकडे जपावीत. त्यात कटुता आणू नये.