Actor Jeevan : आई-वडिलांचं छत्र हरपलं, घरही सोडलं; संघर्षातून घडला हिंदी चित्रपटसृष्टीचा दिग्गज खलनायक
Actor Jeevan : अभिनयाची त्यांची आवड आणि जिद्द पाहून सिन्हा यांनी त्यांना 'फॅशनेबल इंडिया' या चित्रपटात संधी दिली.

Actor Jeevan : हिंदी चित्रपटसृष्टीत नायकाइतकाच खलनायकही महत्त्वाचा मानला जातो. खलनायकाच्या दमदार अभिनयामुळेच अनेक चित्रपटांना वेगळी उंची मिळते. अशाच एका अभिनेत्याने आपल्या प्रभावी अभिनयाने रुपेरी पडद्यावर खलनायकाला नवी ओळख मिळवून दिली. हा अभिनेता म्हणजे ‘जीवन’. त्यांचे खरे नाव ओंकार नाथ धर होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘नारद मुनी’ म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती.
..अन् 18 व्या वर्षी घर सोडलं
1915 मध्ये काश्मीरमध्ये जन्मलेल्या जीवन यांनी लहानपणापासून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. जन्मानंतर लगेचच त्यांनी आईला गमावलं, तर वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांनीही त्यांची साथ सोडली. अभिनयाला विरोध असलेल्या कुटुंबात वाढलेल्या जीवन यांनी अखेर वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला. खिशात अवघे 26 रुपये घेऊन ते मुंबईत झाले आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आले.
‘फॅशनेबल इंडिया’ चित्रपटात मिळालं काम
स्वप्नांची नगरी मुंबईत आल्यानंतर जीवन यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामाच्या शोधात असताना त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन लाल सिन्हा यांच्या स्टुडिओमध्ये काम मिळालं. अभिनयाची त्यांची आवड आणि जिद्द पाहून सिन्हा यांनी त्यांना ‘फॅशनेबल इंडिया’ या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटात मिळालेल्या भूमिकेनंतर त्यांच्यासाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले.
हेही वाचा : Maharashtra School: उन्हाळाच्या सुट्ट्यानंतर आता शाळा कधीपासून सुरु होणार? १५ जून की २२ जूनला…
अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम
जीवन यांनी विविध भाषांतील जवळपास 60 चित्रपटांमध्ये ‘नारद मुनी’ची भूमिका साकारली. यामुळे त्यांना नारद मुनी असेही म्हटले जाते. 1935 साली प्रदर्शित झालेल्या ‘रोमँटिक इंडिया’ या चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘अफसाना’, ‘स्टेशन मास्टर’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘धर्मवीर’, ‘नागिन’, ‘शबनम’, ‘हीर-रांझा’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘कानून’, ‘सुरक्षा’ आणि ‘लावारिस’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या.
‘जीवन’ हे पडद्यावरील नाव
विशेष म्हणजे, जीवन यांना लवकरच जाणवलं की मुख्य नायकाच्या भूमिकेपेक्षा खलनायकाच्या भूमिका त्यांना अधिक शोभून दिसतात. त्यांनी हा मार्ग स्वीकारला आणि पुढे जाऊन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय खलनायकांपैकी एक बनले. निर्माते-दिग्दर्शक विजय भट्ट यांनीच त्यांना ‘जीवन’ हे पडद्यावरील नाव दिलं होतं.
अष्टपैलू आणि अजरामर खलनायक
अभिनयासोबतच त्यांनी फोटोग्राफी, नृत्य, ॲक्शन आणि संगीत क्षेत्रातही प्रयत्न केले. मात्र, त्यांना खरी ओळख आणि यश अभिनयातूनच मिळालं. 10 जून 1987 रोजी वयाच्या 71व्या वर्षी जीवन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू आणि अजरामर खलनायक गमावला. आजही त्यांच्या भूमिका आणि अभिनयाची छाप रसिकांच्या मनात कायम आहे.





