प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्रगडावर दुर्दैवी अंत
जुन्नर -गोरेगाव (मुंबई) येथील प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत (वय 60) यांचा हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावर रॅपलिंग करताना खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. “सह्याद्रीची घोरपड’ म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत हे 30 जण सहभागी झालेल्या मोहिमेचे प्रमुख होते.
कड्यावर रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. याबाबतची अधिक माहिती अशी की, गिर्यारोहकांची 30 जणांची टीम अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 18) हरिश्चंद्रगडावर आली होती.
हरिश्चंद्र गडाचा कोकणकडा ते माकडनाळपर्यंत त्यांची टीम आधी वरून खाली आणि त्यानंतर आडवे रॅपलिंग करणार होती. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. अरुण सावंतांसोबत असलेले 29 जण पहिला टप्पा उतरून आले होते. सर्वात शेवटी अरुण सावंत दोरीचा सहाय्याने रॅपलिंग करत असताना सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले.
तेव्हापासून सावंत यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. रविवारी (दि. 19) दुपारी स्थानिक व ट्रेकर्सच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह भवानी धारेजवळील दरीतून बाहेर काढण्यात आला.
कोकण कड्याची उंची ही साधारण अठराशे फूट आहे. सावंत जिथून बेपत्ता झाले, ती उंची अंदाजे हजार फूट होती. हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला असलेल्या गावापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यांच्यासोबत असलेल्या इतर गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते; मात्र सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता.
सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं. त्यांच्या अंदाजे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘सह्याद्री’मधील अनेक नव्या वाटा शोधल्या.
सावधानता बाळगण्याची गरज
अरुण सावंत यांच्या दुर्दैवी अंतामुळे गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला असून सराईत गिर्यारोहकांनीही कडे सर करताना अतिशय सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे जुन्नरचे दुर्गअभ्यासक विनायक खोत व गिर्यारोहक रमेश खरमाळे यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यातील विविध गडांवर गिर्यारोहण करण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात, मात्र एखाद्या सराईत व वाकबगार गिर्यारोहकाचा रॅपलिंग करतानाच मृत्यू होण्याची हे बहुधा पहिलीच घटना असल्याचे खरमाळे यांनी सांगितले.