आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही युवकांना अहिंसेची प्रेरणा देणारे शांतिमय आयुष्य जगण्यास प्रेरित करणारे महावीरांचे विचार प्रेरणा देतात. बिहारमधील वैशाली हे क्षेत्र भगवान महावीर यांची जन्मभूमी आहे. भगवान महावीरांचे विचार, शिकवण कोणत्या एका विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी नसून ते साऱ्या विश्वाला अहिंसेचा, शांतीचा संयमाचा व माणुसकीचा विचार देणारे होते. आजही भगवान महावीर यांचे विचार, शिकवण सकारात्मक, शांतिप्रिय, अहिंसायुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतात.
भारताची भूमी पवित्र आहे कारण अनेक महान साधूसंतांनी येथे जन्म घेतला. पवित्र इतिहास व वारसा असलेल्या भारतात आजही नैसर्गिक आपत्ती असो किंवा दुर्घटना होवो धर्म, जात-पात, गरीब-श्रीमंत हे भाव विसरून माणुसकीतून प्रत्येकजण मदतीला धावतो हीच आपली संस्कृती आहे. महावीरांनी हिच शिकवण दिली त्यांचा माणसाच्या जातीवर नाही तर कर्मावर विश्वास होता. त्यांनी धन आणि सत्तेपेक्षा माणूस, माणुसकीने त्या व्यक्तीने केलेले काम त्याने केलेले श्रम याला प्रतिष्ठा दिली.
आहार हा शाकाहार असावा, सूर्यास्तापूर्वी जेवण करावे, हे आरोग्यासाठी चांगले असते. पाणी उकळून प्यायल्याने अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. या चांगल्या संकल्पना त्याच्या मागील शास्त्रीय कारण आजही आपण लक्षात घ्यायला हव्यात.
काळ कितीही पुढे गेला तरी भगवान महावीरांनी दिलेली तत्त्वे, सिद्धांत, आचारसंहिता ही कायम समाजासाठी जास्तीत जास्त मूल्यवान ठरणारी आहेत. या मूल्यामुळे समाजात लोकांना निरोगी आरोग्य, मानसिक शांतता राहण्यास मदत होणार आहे.
भगवान महावीर यांनी जैन दीक्षा घेण्याआधीच्या काळात गावात एका हत्तीने धुमाकूळ घातला, गावात मोठे नुकसान केले ही माहिती मिळताच महावीरांनी तेथे जाऊन हत्तीला शांत केले. त्यावेळी महावीरांनी गावकऱ्यांना संदेश दिला की, पशूला जिंकण्यापेक्षा स्वत:ला जिंकण्यात खरी विरता आहे.
आपल्या राष्ट्रीय अस्मितेला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देण्याचे काम महावीरांनी केले. भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशामुळे संपूर्ण जगाला सकारात्मक प्रेरणा व शांतीने जीवन जगण्याची कला मिळाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व महावीरांच्या प्रवचनामध्ये एकवटले आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होते. 28व्या वर्षी त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले.
वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी जैन दीक्षा घेतली. ऐश्वर्य, घर, स्नेही यांचा त्याग केला. घनदाट जंगलात राहून ध्यान केले. ध्यानाच्या सहाय्याने ते आत्मज्ञानी बनले व स्वत:वर विजय मिळविला. अहिंसा हा महावीरांचा आधारभूत सिद्धांत आहे. भूतदया हे महावीरांच्या जैन धर्माचे मुख्य तत्त्व आहे. जगा आणि जगू द्या हा महान सिद्धांत महावीरांनी सांगितला आणि विश्वात अहिंसेचा प्रसार केला.
भगवान महावीरांनी वेद, कर्मकांड, यज्ञ यातून होणारी पशूंची निर्घृण हत्या या प्रथेला तीव्र विरोध केला. अहिसेंच्या तत्त्वाला महावीरांनी विशेष महत्त्व दिले आहे. जगा आणि जगू द्या, अहिंसा, या उपदेशाची शिकवण मानणाऱ्या सर्व अनुयायांनी अहिंसावादी व आदर्शदायी भविष्यासाठी आजच्या परिस्थितीत एकत्र येणे गरजेचे आहे. फक्त मीच तो खरा हा अट्टहास जेव्हा कमी होतो तेव्हाच प्रेम, आपुलकी व जिव्हाळा यांना जागा मिळू शकते हीच महावीरांची शिकवण होती. म्हणून जगा व जगू द्या या महावीरांच्या उपदेशाची आज गरज आहे.
– हर्षद कटारिया