Lok Sabha Election: देशात पाचव्या टप्प्यात 57 टक्के मतदान; राजनाथ सिंह, राहुल गांधी, स्मृती इराणींचे भवितव्य EVMमध्ये बंद

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
पश्चिम बंगालमधील हिंसचाराच्या तुरळक घटना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (इव्हीएम) तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी वगळता मतदान शांततेत झाले. बंगालमध्ये सर्वांधिक ७३ टक्के मतदान नोंदले गेले. तर, महाराष्ट्रात सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली.
मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी ६ नंतरही अनेक केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत आणखी भर पडेल.
उत्तरप्रदेशात पाचव्या टप्प्यात अनेक महत्वाच्या लढती होत आहेत. त्या राज्यात भाजपचे नेते राजनाथ आणि स्मृती यांच्याबरोबरच राहुल यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले. देशात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. आता केवळ २ टप्प्यांचे मतदान बाकी आहे.





