Lok Sabha Election 2024 : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आघाडी केली आहे. दिल्लीतील मतदाराना प्रभावित केले जाऊ शकेल असे कोणते मुद्दे हाती घेता येतील यावर आता या दोन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे.
आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की स्वतंत्र निवडणूक लढवून आम्ही भाजपची स्थिती अधिकच भक्कम केली होती. तिरंगी लढती झाल्यावर हिंदुत्व किंवा राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपला लोकांचा पाठिंबा मिळाला. जी मते भाजपविरोधी होती त्यांचे कॉंग्रेस आणि आपमध्ये विभाजन झाले. मात्र यावेळी तसे होणार नाही कारण आम्ही दोन्ही पक्ष गेल्या एक दशकापासून सत्ताविरोधी लाटेचा सामना करत आहोत आणि आता आमच्या एकाच शत्रुविरोधात आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आपला अशा चार जागा मिळाल्या आहेत की जेथे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या नावावर मते मागितली जाउ शकतात. तसेच कॉंग्रेसला अशा तीन जागा देण्यात आल्या आहेत की जेथे अल्पसंख्याक आणि आरक्षित वर्गाची मते मागता येऊ शकतात.
आपचा नेता म्हणाला की चर्चेच्या सुरूवातीला कॉंग्रेसने त्यांना २०१९ मध्ये मिळालेल्या मतांच्या आधारे आमच्यसमोर पाच आणि दोन म्हणजे कॉंग्रेस पाच आणि आम्ही दोन असा प्रस्ताव ठेवला होता. जरी त्यांनी त्या पाच जागा जिंकल्या नव्हत्या तरी तेथे त्यांना दुसऱ्या क्रमांकाची तर अन्य दोन जागांवर आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
मात्र आम्ही कॉंग्रेसचे गेल्या पाच वर्षांतील आपच्या कामगिरीकडे आणि आम्हाला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ७० पैकी ६३ जागांवरील विजयाकडे लक्ष वेधले. दिल्ली महापालिकेची निवडणूकही आम्ही जिंकलेली आहे आणि आता महापालिका सक्षम केली आहे. त्यावरून हे सिध्द होते की आमची लोकप्रियता वाढली आहे आणि केवळ मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधारावर जागांची वाटणी होऊ शकत नाही.
योगींबाबत चर्चा
कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार आप पहिल्यापासूनच जागावाटपासाठी अनुकूल होती. मात्र जागा कोणी किती लढवायच्या याबाबत एकमत नव्हते. दिल्लीतील कोणत्या जागा कोणी लढायच्या यावरही मतभेद होते. मात्र ते सोडवले गेले. आमचे स्वत:चे सर्वेक्षण, २०२० ची विधानसभा निवडणूक आणि नंतरची २०२२ ची महापालिका निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यावर असे लक्षात आले की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एक रॅली मतांच्या धृवीकरणाला गती देण्यासाठी पुरेसी ठरली होती.