इटानगर -अरूणाचल प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या भाजपला मतदानाआधीच गुड न्यूज मिळाली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह त्या पक्षाच्या ५ उमेदवारांची विधानसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
त्यासाठी १९ एप्रिलला मतदान होईल. त्या राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी समाप्त झाली. मात्र, खांडू यांच्यासह भाजपच्या ५ उमेदवारांविरोधात इतर कुणीही अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
त्याविषयीच्या घोषणेची औपचारिकता आता केवळ बाकी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० मार्च आहे. त्या मुदतीपर्यंत काही उमेदवार माघार घेतील. त्यामुळे आणखी काही जागांवर बिनविरोध निवडी होतील, असा विश्वास खांडू यांनी व्यक्त केला.
त्यांचे चौथ्यांदा आमदार बनणे निश्चित झाले आहे. त्यातील तीनवेळा बिनविरोध निवड होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. अरूणाचलमध्ये विधानसभेच्या ६०, तर लोकसभेच्या २ जागा आहेत. मागील वेळी (वर्ष २०१९) भाजपने विधानसभेच्या ४१ आणि लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या.