नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होईल. त्या जागांवर एकूण १ हजार २१० उमेदवार नशीब आजमावणार आहेत. (Lok Sabha Election 2024: 1210 candidates will try their luck in the second phase)
दुसऱ्या टप्प्यासाठी २ हजार ६३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यातील १ हजार ४२८ अर्ज छाननीनंतर वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी समाप्त झाली. काहींच्या माघारीमुळे नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत याविषयीचे चित्र स्पष्ट झाले.
महाराष्ट्रातील ८ जागांसाठी २०४ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक रिंगणात असणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, त्या पक्षाचे नेते शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (भाजप) यांचा समावेश आहे.
ते तिघेही केरळमधून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय, मावळत्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे राजस्थानमधून रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ७ टप्प्यांत मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी ती प्रक्रिया १९ एप्रिलला पार पडेल.